प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन ; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये त्यांच निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. पिंजरा या सिनेमातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. “भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !” असं पोस्टमध्ये मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 साली झाला. त्यांनी साठच्या दशकात अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. संध्या यांना त्यांच्या ‘पिंजरा’ या सिनेमासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांनी आपल्या अभियाबरोबरच नृत्याचा अविष्कारही सिनेमातून दाखवून दिला.