राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला ; पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा
जळगाव : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यभरात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा जोर वाढणार असून पुणे व रायगड घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.


मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये राज्यभर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागपूरमध्येही पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून सध्या ४,८६२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.