राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकीर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा व लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर ‘सेवा सेतू अभियान’ राबवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पात्र नागरिकांना थेट लाभ देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून जागेवरच लाभ देण्यात येतील. तसेच तालुकास्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार असून, वन हक्क दाव्यांची सुनावणी व मंजुरीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.


‘सेवा सेतू अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जिवंत सातबारा मोहीम, स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, शिधापत्रिका वितरण, नॉन-क्रिमीलेअर व दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन चालक परवाना, नवीन नळ व घरगुती विद्युत जोडणी, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह विविध २२ सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि ग्रामीण नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ‘Innovation Challenge’ आयोजित करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा या उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम करणार आहे.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव व प्रभागात स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रस्ते सुरक्षा जागृरुकता, सरकारी योजनांची जागरुकता, प्लास्टिकमुक्ती आणि डिजिटल साक्षरता यांसह २६ लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘विकसित भारत संकल्प व सेवा ज्योत यात्रा’ उपक्रमांतर्गत राज्यातील परिवर्तनकारी प्रकल्पांची माहिती जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार असून, गावोगावी व शहरांमध्ये बाइक रॅली व ‘सेवा ज्योत यात्रा’ काढून विकसित भारत २०४७ चा संकल्प घेण्यात येणार आहे.
शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून, विजेत्यांचे जिल्हा व राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये माता-बालकांसाठी पोषण व आरोग्य मार्गदर्शन तसेच आशा व अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दि. २ ऑक्टोबर रोजी कलापथकांमार्फत शासकीय योजनांची माहिती देणारे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. तर दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सरपंच ते संसद सदस्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करून या अभियानाची सांगता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करून माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प घेणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभाग हा नोडल विकास म्हणून काम पाहील.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्यस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.