शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट केला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना खासदार राऊत यांनी हे पुस्तक लिहिले आहे, याचे प्रकाशन 17 मे रोजी होणार आहे. या पुस्तकात राऊन यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यात त्यांनी गुजरात दंगलीच्या वेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कशी मदत केली होती, याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
संजय राऊतांनी काय म्हटलं?
या पुस्तकात संजय राऊत यांनी म्हटले की, गोध्रा दंगलीच्या प्रकरणावेळी संपूर्ण देश मोदींच्या विरोधात होता. परंतु ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिले. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली. अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटी बाहेर जाऊन मदत केली. अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआय कडे सोपवला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शाह यांना मदत करता येत नव्हती. अमित शाह गुजरात मधून तडीपार होते.
अमित शहा बाळासाहेबांकडे मदतीसाठी आले होते
अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शाह यांना कोणीतरी सुचवले. एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि मातोश्रीच्या दिशेने निघाले. मात्र त्यांना कलानगरच्या मुख्य गेटवरच अडवून ठेवण्यात आले. कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था कडक होती. दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर आले आणि त्यांनी बाळासाहेबांना सांगितले की, “मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलले तर ते तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत”.
बाळासाहेबांच्या फोनमुळे अमित शाह यांच्या अडचणी दूर झाल्या
बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवरून न्यायमूर्तींना फोन केला आणि त्यांना सांगितले की, “तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका”. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाह यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासतल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या.. या नंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते निर्घृणपणे वागले असं भाष्य राऊत यांनी केलं आहे.