फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप
इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

जळगाव । भविष्यातील कृषी क्षेत्रात नेतृत्व विकसित करण्याच्या मुख्य उद्देशाने स्थापलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) अधिवेशनाचा आज समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान जैन हिल्स येथे तीन टप्प्यात झालेल्या या अधिवेशनात एकूण १६३ कृषी इन्व्होशन आणि १६३ कृषी बिझनेस प्लॅन विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. तिसऱ्या सत्रातील इन्व्होशनमध्ये सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर) आणि बिझनेस प्लॅनमध्ये अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ) या शाळांना प्रथम क्रमांक मिळाला. ८ आणि ९ च्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा जास्त शाळांचा समावेश आहे. या उपक्रमाला जैन इरिगेशनचे सहकार्य लाभले आहे.


तिसऱ्या सत्राच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. समारोप भाषणात बोलताना जैन इरिगेशनचे अभिजित जोशी यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की, मी जैन इरिगेशनमध्ये रुजू झाल्यानंतर भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी लायब्ररीत पुस्तके लावण्यास सांगितले. त्यावेळी मोठ्याभाऊंनी आपल्या यशाचे रहस्य सांगताना, “मी चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं कधीच हातातून जाऊ देत नाही,” हा जीवनमंत्र मला दिला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी आपल्या भाषणात फालीचा विकासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी शार्बोनी पोद्दार यांची ओळख करुन दिली.
जळगावच्या अनुभूती स्कूलला दोन पारितोषिक
फालीच्या तिसऱ्या सत्रात जळगावच्या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलला दोन पारितोषिक मिळवली. इन्व्होशनमध्ये अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नेक्सो बायोपल्गला तिसरा तर बिझनेस प्लॅनमध्ये कार्बोक्रेड कार्बन क्रेडीट अँण्ड सस्टेनबेल अॅग्रीकल्चर प्लॅटफॉर्मला पहिले पारितोषिक मिळाले.
फालीच्या तिसऱ्या सत्रात पारितोषिक विजेत्या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यात-
कृषी इन्व्होशन सादरीकरण – प्रथम- सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर), द्वितीय- सरस्वती साधना विद्या मंदिर, शांतीवन (आर्वी, बीड), तिसरा- अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ), चौथा- महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा), पाचवा- अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (सातारा) तर
कृषी बिझनेस प्लॅन – प्रथम-अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव ), द्वितीय-सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर ), तिसरा- एम जी शहा विद्यामंदिर (बाहुबली, कोल्हापूर), चौथा- दानोळी हायस्कूल (दानोळी, कोल्हापूर), पाचवा- महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा) या शाळांना गौरविले गेले.
फालीचे विद्यार्थी त्रिलोक चौधरी (देवास), श्रावणी अडसरे (नाशिक), प्रिया जरांगे (बीड), सार्थक येवले (पुणे) यांनी या उपक्रमातून काय शिकण्यास मिळाले, त्याबद्दल आपले अनुभव सांगितले. तसेच फालीच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यात प्रतिक्षा नांगरे आणि हर्षवर्धन खिल्लारे यांचा समावेश आहे. विनोद चौधरी (गोदरेज अॅग्रोवेट), अंकीत लढ्ढा (यूपीएल), शुभेंदू दास (आयटीसी), दुर्गेश गोयल (स्टार मॅग्री), मुक्तार आलम (एसबीआय फाउंडेशन), विभाकर (रॅलीज इंडिया), प्रकाश मकवाना (प्रॉम्ट), मिहीर पटेल (अमूल) या कंपनी प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. फालीच्या या उपक्रमास जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल, उज्जीवन, रयत शिक्षण संस्था आणि गांधी रिसर्च फाउंडेशन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.