मोठी बातमी! संजय दत्त रोखू शकला असता 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट? उज्ज्वल निकम यांनी केला धक्कादायक खुलासा
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी ‘प्रहार’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात तो देशाचे प्रसिद्ध सरकारी वकील आणि विद्यमान खासदार उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चर्चेदरम्यानच, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांबाबत आणि त्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या भूमिकेविषयी एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा दावा केला आहे.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणाले, संजय दत्तने योग्य वेळी समजूतदारपणा दाखवला असता, तर मुंबईत 1993 मध्ये झालेले ते भीषण बॉम्बस्फोट रोखता आले असते आणि शेकडो निष्पाप लोकांचे प्राण वाचले असते.


अबू सालेम हत्यारांचा ट्रक घेऊन आला होता; निकम यांचा मोठा खुलासा
संजय दत्त 1993 चे बॉम्बस्फोट रोखू शकला असता का? असा सवाल उज्ज्वल निकम यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना निकम म्हणाले, स्फोटांच्या आधी कुख्यात गँगस्टर अबू सालेम (Abu Salem) हा एका टेम्पो ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रे घेऊन आला होता. या शस्त्रास्त्रांमध्ये अनेक हँड ग्रेनेड (हातबॉम्ब) आणि एके-47 (AK-47) रायफल्सचा समावेश होता. संजय दत्तने यातील काही शस्त्रे स्वतःकडे ठेवून घेतली होती, नंतर त्याने हँड ग्रेनेड्स परत केले होते.
संजय दत्तला जेव्हा त्या घातक शस्त्रांविषयी माहिती मिळाली, तेव्हाच त्याने न घाबरता तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली असती, तर आज चित्र काही वेगळे असते. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती आणि स्फोटांचा कट वेळीच उधळून लावला असता. संजय दत्तच्या एका माहितीमुळे संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला असता आणि गुन्हेगार आधीच गजाआड झाले असते, असा दावा निकम यांनी केला.
मुलाखतकाराने विचारले की, यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले असते का? त्यावर उज्ज्वल निकम यांनी पूर्ण सहमती दर्शवली. ते म्हणाले, मी संजय दत्तला या प्रकरणात जबाबदार धरण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की, त्याच्याकडे स्फोट रोखण्याची सूवर्णसंधी होती, पण त्याने पोलिसांना सांगितले नाही. त्याने वेळेत पोलिसांना अलर्ट केले असते, तर मुंबईत झालेला भीषण नरसंहार आणि निष्पाप लोकांचा गेलेला जीव निश्चितपणे टाळता आला असता.