ST प्रवाशांना मोठा धक्का! आजपासून बसभाड्यात 13.56% वाढ
ऐन सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रातील लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा कात्री लागली आहे. डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी अखेर राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) तिकीट दरात सरासरी १३.५६ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, हे नवे दर लागू झाले आहेत.

मात्र, या दरवाढीतून मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रीमियम एसी शिवनेरी, शिवशाही बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे भाडे जैसे थे ठेवण्यात आले आहे. आजपासून तिकीट दर ५ ₹ च्या पटीत होणार आहे. महामंडळाच्या विविध सेवांसाठीचे (Ordinary, Semi-Luxury, AC Shivshahi इत्यादी) प्रौढ आणि लहान मुलांचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. महामंडळाच्या नियमांनुसार ५.५% प्रवासी कर वगळून येणाऱ्या रकमेवर ५% जीएसटी जोडण्यात आला असून अंतिम तिकीट दर हे ५ रुपयांच्या पटीत (Rounding off) निश्चित करण्यात आले. सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत.


त्याशिवाय अमृत जेष्ठ नागरिकांकडून सुद्धा ५ रुपये वसूल करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. ही दरवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेतल्याचा दावा केला आहे. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार असले, तरी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एसी शिवनेरी बसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडेवाढ लागू झाल्यावर ६ किलोमीटरसाठीचे किमान बस भाडे १३ रुपयांवरून १५ रुपये होईल. ही ताजी दरवाढ राज्य परिवहन संस्थेसाठी एका वर्षातील दुसरी मोठी भाडेवाढ आहे. गेल्या वर्षी एमएसआरटीसीने भाडेवाढ जवळपास १५ टक्क्यांनी केली होती, तर पूर्वी भाडेवाढ साधारणपणे वार्षिक ४% ते ५% पर्यंत मर्यादित असायची, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बस सेवांचा विस्तार आणि १ ऑगस्टपासून सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रणाली सुरू करण्याचा समावेश आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवासातील सवलती मिळवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणे आवश्यक असेल. एमएसआरटीसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एनसीएमसी कार्यक्रमासाठी ६२ लाखांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत ३५ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. स्मार्ट कार्ड-आधारित प्रणालीमुळे तिकीट प्रक्रिया सुव्यवस्थित होईल, मानवी श्रमाची प्रक्रिया कमी होईल आणि सवलत व्यवस्थापनात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.