समाज कल्याण ट्रस्ट, भिवंडीची श्रीक्षेत्र शिर्डी श्रावणी पालखीसह पदयात्रा प्रसंगी नानजीभाई ठक्कर(ठाणावाले)
समाज कल्याण ट्रस्ट, भिवंडी यांच्या वतीने आयोजित श्रावणी पालखी सह पदयात्रा महोत्सव–२०२६ श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला. भिवंडी ते श्रीक्षेत्र शिर्डी या पवित्र पदयात्रेत हजारो साईभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साईबाबांप्रती आपली अखंड श्रद्धा व्यक्त केली.

दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता समाज कल्याण ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून साईबाबांच्या पालखीचे पूजन, आरती आणि मंगलघोषानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी समाजसेवक श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाले), श्री. राजेशभाई जमनादास अनम, श्री. राजेंद्र पुराणी, श्री. राजेंद्र पांडे यांच्यासह आयोजक धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील, मा. आमदार श्री. महेश लक्ष्मण चौघुले, श्री. नारायण (बाबा) पाटील, श्री. जे. के. पाटील (विशेष सहकार्य), समाज कल्याण न्यासाचे कार्यकारी सदस्य व अध्यक्ष तसेच सल्लागार श्री. विश्वनाथराव आपटे, श्री. संजय गोसावी, श्री. प्रकाश देवळीकर, श्री. भाईदास भोईर, श्री. मिलिंदभाई सोमवंशी, श्री. ज्ञानेश्वर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी समितीत श्री. प्रमोद पाटील, श्री. के. के. पाटील (उपाध्यक्ष), श्री. शेखर पाटील (खजिनदार), श्री. रघुनाथ पाटील, श्री. उमेश गांडुरकर, श्री. दीपक मांडले (सचिव) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण यात्रेदरम्यान “पाय हळूहळू चला, मुखाने साईनाथ म्हणा” या भक्तिमय घोषात भाविक भजन, कीर्तन आणि साईनामाचा जप करीत पुढे जात होते.
मार्गातील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्थानिक नागरिकांनी पालखीचे पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. पदयात्रेकरूंसाठी पाणी, चहा, नाश्ता, भोजन तसेच वैद्यकीय सेवेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.


श्रीक्षेत्र शिर्डी येथे पोहोचल्यानंतर साईबाबांच्या समाधी मंदिरात पालखीचे पूजन, महाआरती आणि विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी विश्वात सुख, शांती, समृद्धी आणि मानवकल्याण नांदावे, यासाठी भाविकांनी प्रार्थना केली.
यावेळी समाजसेवक श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, समाज कल्याण न्यास, भिवंडी यांच्या वतीने आयोजित भिवंडी ते श्रीक्षेत्र शिर्डी श्रावणी पालखी सह पदयात्रेला यंदा १४ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारी ही श्रावणी पालखी पदयात्रा समाजात भक्ती, सेवा, शिस्त आणि एकतेचा प्रेरणादायी संदेश देत आहे. यंदाही युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह मोठ्या संख्येने साईभक्तांनी सहभागी होऊन या महोत्सवाला भव्य यश मिळवून दिले.
या संपूर्ण आयोजनाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण ट्रस्टचे पदाधिकारी, पालखी समितीचे सदस्य, स्वयंसेवक, दाताश्री तसेच सर्व सहकाऱ्यांनी निःस्वार्थ सेवाभावाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयोजकांनी सर्व भाविक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
महाआरती, महाप्रसाद आणि साईबाबांच्या जयघोषात श्रावणी पालखी सह पदयात्रा महोत्सवाचा भक्तिमय समारोप झाला. आगामी वर्षी या पवित्र यात्रेत आणखी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.