जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला

0

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण घटविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या तरसोद–पाळधी बायपास महामार्गावरील पुलाचे पिलर खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या बायपासवरील पुलाच्या संरचनेला तडे गेल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली आहे.

मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणाऱ्या या बायपासचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत करण्यात आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर पुलाच्या पिलरभोवतीची माती वाहून गेली असून काही भाग उघडा पडल्याचे दिसून आले आहे. तसेच रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तरसोद ते पाळधी या बायपासवरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाळधी गावाजवळ बॅरिकेड्स, सूचना फलक आणि मुरूम टाकून मार्ग बंद करण्यात आला असून सर्व वाहतूक जळगाव शहरातील मुख्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर पुन्हा एकदा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे. पुलाच्या स्थितीचा तांत्रिक आढावा घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पाहणी करण्यात येत असून दुरुस्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या प्रकाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण आणि कामाच्या गुणवत्तेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, अवघ्या वर्षभरातच पुलाच्या संरचनेत बिघाड झाल्याने नागरिकांकडून या कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तांत्रिक तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार असले, तरी सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या टिकाऊपणाबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.