शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खरी पूर्व नियोजन बैठकीत ट्रॅक्टर वाटप ; अपघातग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान वाटप व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान
जळगाव | धरणगाव व जळगाव तालुक्यांच्या खरीप हंगाम 2026 पूर्वनियोजन आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी हिताला बाधा आणणाऱ्या सर्व घटकांविरोधात कठोर भूमिका घेत, बोगस बियाणे, खते, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका. शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असा सज्जड इशारा देत खरीप हंगामासाठी खतांच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत निश्चिंत राहावे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.


जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे जळगाव व धरणगाव तालुक्यांकरिता संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बदलत्या हवामान व संभाव्य खरीप आव्हानांवर चर्चा करत शेतकऱ्यांना शाश्वत, शास्त्रशुद्ध शेतीसाठी सज्ज राहण्याचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, कृषी विभाग हा शेतकऱ्यांचा विश्वासाचा आधार असून त्या भावनेतून संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे मशागतीची कामे शक्यतो सकाळी लवकर करावीत. बदलत्या निसर्गचक्रामुळे धूळपेर टाळून बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक व मिश्रपीक पद्धती अवलंबावी.
अनधिकृत कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करून पक्के बील घ्यावे व ते हंगाम अखेरपर्यंत जतन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, कृषी अधिकाऱ्यांनी नियमित शेतशिवार भेटी द्याव्यात आणि गावपातळीवर तरुण व महिलांनी शेतकरी गट स्थापन करून कृषी संलग्न व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
लाभार्थींना अनुदान वाटप व शेतकरी सन्मान
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांना अपघातानंतरचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून, यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थी पंकज सुपडू सोनवणे, अनिता शांताराम पाटील व विनायक कोळी यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. तसेच
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आदर्श शेतकरी योगेश झांबरे यांनी गावपातळीवर प्राथमिक प्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच गोकुळ लंके (पथराड) व सुरेश पाटील (वावडदा) यांना उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती क्षेत्रात विकास साधल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर वाटप व शेतकरी गटाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी (जळगाव) स्नेहल थेऊरकर व तालुका कृषी अधिकारी (धरणगाव) प्रशांत देसाई यांनी आपापल्या तालुक्यातील खरीप हंगामी नियोजनाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी अमित भामरे व सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील व दिपक नागपुरे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभन मस्के, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी, गोकुळ चव्हाण, तालुकाप्रमुख गजानन पाटील, डी. ओ. पाटील, प्रगतशील शेतकरी गोपाल पाटील, कृषीभूषण अनिल सपकाळे, किशोर चौधरी यांच्यासह कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.