जळगावसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार
पुणे । राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून यातच पुन्हा एकदा राज्यावर बेमोसमी पावसाचे संकट आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाने चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसायट्याचा वारासह मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने १ एप्रिल रोजी जळगावला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तापमान वाढले असून यामुळे दुपारनंतर प्रचंड ऊन तापत आहे. जळगावचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाडाही वाढला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे देशातील हवामानात सतत बदल होत आहेत. महाराष्ट्रात दिवसा ऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारे वाहात आहेत. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे.
हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशारा दिल्यामुळे रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला आल्या आहेत. दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार मच्छीमारी बोटी आहेत.