सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला आहे. तसेच या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणा प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे.
451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितले आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
दरम्यान, आयोगाने गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण चांगलेच तापलेले आहे. तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषींवर कारवाई हवी आहे, अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्याने करत आहेत.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पोलिसांचा दावा
न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून, पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली होती. अशातच आता न्याय दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने यात पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.