महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला मिळणार मंत्रि‍पदे?

0

मुंबई । महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली असून या विस्तारासाठी महायुतीमध्ये सूत्रही ठरले आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्या शनिवारी १५ ते २० मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ८ ते १० मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे ५-५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितलेय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे कोण कोणती खाती जाणार? याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार मंत्रि‍पदे ?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहळी झिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. पुढच्या टप्प्यात अनिल पाटील, दत्ता भरणे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला?
शिवसेनेकडून ५ ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये मंत्रि‍पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे अडीच अडीच वर्षे मंत्रि‍पदे फिरती राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून कोण कोणते नेते मंत्रि‍पदाची शपथ घेणार?
भाजपकडून सर्वाधिक १० मंत्रि शनिवारी शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचा समावेश असू शकतो. त्याशिवाय मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, राणा जगजीतसिंह पाटील,राहुल ढिकाले, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेचा मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॅार्मुला
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधीत मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्री पदाची संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.