मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असून महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा देखील सुरु आहे. मात्र या निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात ‘लोक पोल’ने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं दिसतंय. या नव्या सर्व्हेनं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे.
राज्यात नुकतेच झालेल्या ‘लोक पोल’च्या ताज्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, एनडीए म्हणजेच महायुतीला महाराष्ट्रात ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळू शकतात . त्याचबरोबर इतर पक्षांना ५ ते १८ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. एनडीएची मतांची टक्केवारी ३८ ते ४१ टक्के तर महाविकास आघाडीची ४१ ते ४४ टक्के आणि इतरांची १५ ते १८ टक्के असण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वेक्षण कसे केले?
निवडणुकांशी संबंधित जनमत चाचण्या आणि अंदाज वर्तवणाऱ्या ‘लोक पोल’ने जवळपास महिनाभर राज्यात ग्राउंड सर्व्हे केलाय. याचा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आलाय. सर्वेक्षणादरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे पाचशे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण सर्वेक्षणामध्ये एकूण दीड लाख नमुने घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.
महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने बहुमतासाठी १४५चा जागांचा आकडा आवश्यक आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत