जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा खून ; जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला
भुसावळ : जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाची घटना समोर आलीय. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार, 4 जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेत अन्य तिघे जखमी झाले आहेत. सय्यद आरीफ अली सय्यद समद अली (28, वरणगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वरणगाव नगरपालिकेच्या पुढे क्वालिटी जनरल स्टोअरजवळ दोन कुटूंबात दुचाकी लावण्यावरून मंगळवारी वाद झाला होता व यापूर्वी डिसेंबर महिन्यात संबंधित कुटूंबात वाद झाल्याने त्याबाबत वरणगाव पोलिसात तक्रारही दाखल होती. मंगळवारी वाद उफाळून आल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तर तीन संशयीतांनी सय्यद आरीफ अली सय्यद समद अली या तरुणाच्या पोटावर, छातीवर सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला तर या घटनेत सैय्यद मुस्ताक अली उर्फ शाहरुख बाबा (50), आकिब अली कमर अली (22) व सय्यद खान हे जखमी झाले.
दरम्यान, जखमी सय्यद आरीफ यास गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत सय्यद आारीफ वरणगाव येथील रहिवासी असून त्याचा कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय आहे. मुक्ताईनगर डीवायएसपी राजकुमार शिंदे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.