२० जूनला मान्सून दाखल होणार, पण…; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोठा इशारा!

0

राज्यातील शेतकरी राजा सध्या चिंतेत पडला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता; मात्र मान्सून अजूनही अरबी समुद्रातच रेंगाळला आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या विपरीत वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला असून, तो एकाच ठिकाणी स्थिरावला आहे. आता हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, २० जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. या बदलत्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची धाकधूक कमालीची वाढली आहे.

यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यातच आता ‘एल निनो’चे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ पूर्णपणे सक्रिय असल्याने, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील मान्सून आजच्या घडीला धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आणि अपेक्षा २० जून रोजी होणाऱ्या मान्सूनच्या आगमनावर खिळल्या आहेत.

पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी आपली शेते पेरणीसाठी पूर्णपणे तयार ठेवली आहेत. शेतांची नांगरणी झाली असून, घरात बियाणे आणि खते आणून ठेवली आहेत. मात्र, वरूण राजा बरसण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मान्सून लांबल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना मोठे आवाहन केले आहे. “शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. हवामान विभाग आणि प्रशासनाकडून ज्यावेळी अधिकृतपणे सांगितले जाईल, त्याच वेळी शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाचा मोठा इशारा: “घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट!”
मान्सून २० जूनला दाखल होईल असा अंदाज असला, तरी तो केवळ एक अंदाजच आहे. यापूर्वीचा १५ जूनचा अंदाज हुकल्याने कृषी विभाग सतर्क झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना कडक इशारा दिला आहे की, जोपर्यंत कृषी विभागाकडून अधिकृतपणे पेरणीचे आवाहन केले जात नाही, तोपर्यंत कोणीही पेरणी करू नये. अपुऱ्या पावसात पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन शेतकऱ्यांवर ‘दुबार पेरणी’चे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाल्यावरच पुढील पाऊल टाकावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.