महारातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या जागांसाठीचे मतदान १२ मे २०२६ रोजी पार पडणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून आलेले उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संजय केणेकर यांसारख्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे.
विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.


दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक काय ?
महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अर्जांची छाननी २ मे २०२६ रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ४ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मतांची मोजणी केली जाईल.