भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

0

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; कृषी, पाणी, अन्नप्रक्रिया आणि शाश्वत विकासावर भर

जळगाव  | “भविष्याचा पाया येथूनच… भक्कम पाया आणि सतत उत्क्रांती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची ३९वी सर्वसाधारण वार्षिक सभा कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिक पार्क येथे उत्साहात झाली. कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसह कृषी, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. व्यासपीठावर सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, स्वतंत्र संचालक डॉ. नरेंद्र जाधव, मुख्य वित्त अधिकारी बिपिन वळामे, कंपनी सचिव अवधूत घोडगावकर, संचालक शिरीष दलाल हे उपस्थित होते तर डॉ. अशोक दलवाई, सतीश मेहता, नॅन्सी बॅरी ऑनलाइन सहभागी होते. जैन परिवारातील सदस्य, भागधारक तसेच कंपनीचे सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अवधूत घोडगावकर यांनी केले.

सभेची सुरुवात दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करून झाली. ऑडिटरचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. अजित जैन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली, तर अथांग जैन व अभेद्य जैन यांची नियुक्ती करण्यात आली.

‘भवरलाल जैन यांच्यासारखा व्हिजनरी पाहिला नाही’ – डॉ. नरेंद्र जाधव

कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. “भवरलालजी जैन यांच्यासारखे व्हिजनरी व्यक्ती मी कधीही पाहिलेले नाही. जैन इरिगेशन हे जगातील अद्वितीय मॉडेल आहे. जैन बंधू हे मॉडेल पुढे घेऊन जात आहेत, याचा आनंद आहे,” असे स्वतंत्र संचालक डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

एआयसोबत कृषी तंत्रज्ञानाची सांगड

अनिल जैन यांनी कंपनीच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. जैन इरिगेशनची मुळे कृषिक्षेत्रात भक्कम आहेत. या भक्कम पायावर नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सूक्ष्मसिंचना सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.” “जैन इरिगेशन ही केवळ कंपनी नसून शेतकऱ्यांना सर्व दृष्टीने सोल्युशन देणारी कंपनी आहे,” जैन इरिगेशनच्या केळी टिश्युकल्चरमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पर एकरी वाढ होऊन आमुलाग्र बदल झाला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘रिसोर्स टू रूट’ कडे वाटचाल

पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जलकार्यक्षमतेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी ‘रिसोर्स टू रूट’ या संकल्पनेवर काम करीत असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे अनिल जैन यांनी सांगितले. टिश्यूकल्चर रोपांची वाढती मागणी लक्षात घेता अत्याधुनिक हायटेक प्लांटच्या विस्ताराचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी अवशेषांपासून बायोचार; कार्बन क्रेडिटची संधी कृषी अवशेषांचा प्रभावी वापर करण्यासाठी कंपनीने बायोचार प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे कृषी कचऱ्याचे मूल्यवर्धन होण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कार्बन क्रेडिट मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगण्यात आले.

फार्मिंग इकोसिस्टम विकसित

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे विकसित भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी केवळ सिंचन नव्हे, तर शेतीभोवती संपूर्ण फार्मिंग इकोसिस्टम विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे. फूड प्रोसेसिंग क्षेत्रातही कंपनी सातत्याने पुढे जात असून, कृषी उत्पादनाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात आहे.

फर्टिलायझर क्षेत्रातही संशोधन सुरू असून, लवकरच त्यासंदर्भात पुढील कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काळी मिरी आणि कॉफीच्या क्षेत्रातील प्रकल्प भविष्यातील कृषी विकासाची दिशा बदलणारे ठरू शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बाजारातील अस्थिरतेवर मात करत शाश्वत विकास

बाजारातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत कंपनीची शाश्वत विकासाकडे घोडदौड सुरू आहे. पाणी, माती, तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, अन्नप्रक्रिया आणि पर्यावरण यांचा समन्वय साधत भविष्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे अनिल जैन यांनी स्पष्ट केले. “मुळे भक्कम असतील तरच भविष्याची इमारत मजबूत उभी राहते. जैन इरिगेशनचा पाया कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये भक्कम आहे; त्यावर तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची उंची वाढवत भविष्य घडविले जात आहे,” या भावनेतून कंपनीच्या पुढील वाटचालीचा आशावादी सूर सभेत उमटला. राष्ट्रगीताने समारोप झाला.

जैन इरिगेशनचा ₹१,५०८ कोटींचा महसूल

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६-२७च्या “जैन इरिगेशनचा एकत्रित महसूल ₹१,५०८.४ कोटी, तर व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा (EBITDA) ₹१६४.३ कोटी राहिला.” पॉलिमरच्या किमतीतील चढ-उतार आणि मान्सूनच्या वेळेमुळे देशांतर्गत पाइप व ड्रिप व्यवसायातील काही खरेदी पुढे ढकलली गेली. मात्र, कृषी प्रक्रिया आणि परदेशातील प्लास्टिक व्यवसायाने चांगली कामगिरी केली. मे-जूनमध्ये व्यवसायाला गती मिळाली असून कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात कंपनीला यश आले. पॉलिमरच्या किमती स्थिर होत असून चांगल्या पावसामुळे कृषी मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिकवर्ष २७ मध्ये दुहेरी अंकातील महसूलवाढ आणि दुसऱ्या सहामाहीत दमदार कामगिरीचा कंपनीला विश्वास आहे असे अनिल जैन यांनी मनोगतात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.