पोटच्या लेकरांवर जन्मदात्याचा कुऱ्हाडीने जीवघेणा वार; चिमुकली ठार, भाऊ मृत्यूशी झुंजतोय

0

चोपडा | जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. जन्मदात्या वडिलांनी झोपेत असलेल्या आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याने 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडती गावातील सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) याने रविवारी पहाटे घरात झोपलेल्या आपल्या मुलांवर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला (वय 13) हिच्या डोक्यावर गंभीर वार झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रामु सुभाष भिलाला (वय 11) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी सुभाष भिलाला हा जंगलाच्या दिशेने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडे घटनेसंदर्भात सखोल चौकशी सुरू असून हल्ल्यामागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक तपासात दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा इतर कोणते कारण यामागे आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात भीती आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.