हवामान खात्याकडून राज्यातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई । राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून दुसरीकडे उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात वादळी पावसाची हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यात १२ ते १४ जूनच्या सुमारास मॅान्सून सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यातही मान्सून पावसाची प्रतीक्षा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात तापमानाचा चढ-उतार सुरू राहील, तापमान ३८ ते ४० अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास आणखी काही दिवस असाच सहन करावा लागणार आहे.