नागपूरमध्ये तुफान राडा

0

नागपूर । औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्य तापलंय. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. अशातच नागपूरमध्ये १७ मार्चच्या रात्री २ गटात तुफान राडा झालाय.

काहींनी दगडफेक केली. परिसरातील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान केले. जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत २० ते २५ पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.

धारदार शस्त्रे आणि जाळपोळ
नागपुरातील हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेनं घटनेदरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती दिली. ‘जवळपास ३० ते ३५ लोक आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधून आले होते. त्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. ते एकमेकांवर हल्ला करत होते. काहींच्या हातात धारदार शस्त्र, स्टिक्स आणि बाटल्या होत्या.

जमावाने एकदम गोंधळ सुरू केला. काही ठिकाणी आग लावली. धारदार शस्त्रांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. दुकानांची तोडफोड केली. यावेळी दुकानं बंद करण्यास सांगितले होते. त्यामुळे दुकानांचे फार नुकसान झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे’.

हंसापुरी भागातील एक दुकानदारानं सांगितले की, ‘रात्री १०:३० वाजता मी दुकान बंद केले. काही लोक अचानक आले आणि त्यांनी वाहनांना पेटवण्यास सुरूवात केली. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. माझ्या दोन गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे’. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं होतं. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.