तुमच्या निर्लज्ज सरकारचा आम्ही निषेध करतोय.. रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका
जळगाव । राज्यात वाढणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच आता घडणाऱ्या घटना पाहिल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू स्वत: ठेवण्याची वेळ आल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं असून यावरून आता नवा वाद सुरू झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
रोहिणी खडसे यांनी, गुलाबराव पाटील म्हणतात पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवा, आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा. पण महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये. कारण याआधी आपण महिलांचा कसा सन्मान करता हे दाखवून दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना आपण मालिनी यांच्या गालांशी केली होती. यामुळे महिलांचा सन्मानाबाबत आपल्याला किती काळजी आहे ते आम्ही आधीच बघितले आहे असा टोला लगावला आहे.
तसेच रोहिणी खडसे गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करताना, तुमच्या प्रवृत्तीचाही निषेध करत असल्याची टीका केली आहे. गुलाबराव म्हणातात ते आता महिलांनी सुरक्षिततेसाठी त्यांना हवे ते त्यांनी करावं. यात सरकारची कोणतीही भूमीका नसेल. सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीही करणार नाही, असाच त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे. यामुळे हे महायुतीचे सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे अपयशी ठरले आहे. जे गुलाबराव पाटलांनी मान्य केलं आहे, असा दावाही रोहिणी खडसे यांनी केला आहे.
तर एकीकडे आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून संघर्ष करत असताना गुलाबराव पाटील आपले अंग काढून घेत आहेत. लढण्याऐवजी महिलांनो आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा म्हणत तुमचं काय ते बघा असे वागत आहेत. यामुळे तुमच्या अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असून तुमच्या निर्लज्ज सरकारचा देखील आम्ही निषेध करतोय असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला आहे.