‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे महायुतीमध्ये मतमतांतरे असल्याचं दिसून आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी उघडपणे या घोषणेला विरोध केला होता. बटेंगे तो कटेंगे यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेय. योगींच्या घोषणाला राज्यभरातून अनेकांनी विरोध दर्शवला असतानाच आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगींच्या घोषणेला एकप्रकारे समर्थनच केलेय.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलेय. बटेंगे तो कटेंगे या घोषणाबाजीत काहीही चुकीचे दिसत नसल्याचे सांगत हा आपल्या देशाचा इतिहास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत विचारले. मला योगीजींच्या घोषणेमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. या देशाचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा हा देश जाती, प्रांत आणि समुदायांमध्ये विभागला गेला तेव्हा, हा देश गुलाम झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला हे समजत नाही की जर कोणी म्हणत असेल की फूट पाडू नका, तर त्यावर आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजात विरोधक फूट पाडत आहेत, मोदींच्या आरोपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे हेतू उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे हेतू स्पष्ट होतात. कदाचीत राहुल गांधी यांना मिडिया सर्वत्र पाठलाग करत असल्याचे त्यांना माहित नसावे, त्यांनी चूक केली, असेही फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांनी जेव्हा अमेरिकेत जाऊन संविधान आणि आरक्षणावर विधाने केली होती. तेव्हा त्यांची मानसिकता उघड झाली होती. ते ज्या पद्धतीने विविध जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप बरोबरच आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.