गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
जळगाव । निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरण ९०% भरले असून आ शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. गिरणा काठ परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे शेतकरी वर्गासह नागरिक आनंदात आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत गिरणा धरण १००% भरण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले तरीही गिरणा धरणात ५० टक्केही पाणीसाठा वाढला नव्हता. त्यामुळे गिरणा पट्ट्यात चिंतेचे सावट होते. मात्र, या महिन्यात नाशिक जिल्ह्यात विशेषत: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने धरण साठ्यात कमालाची वाढ होत आहे.
गिरणा प्रकल्प आज दि. २७ ऑगस्ट रोजी सकळी ६ पर्यंत ८७.४५% भरलेला आहे. गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून सध्यास्थितीत गिरणा प्रकल्पामध्ये अंदाजे ३५ हजार ते ४० हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सध्या धरणात होत आहे.
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून सध्या येणारे पाणी पाहता गिरणा धरण आज मंगळवारीच (ता. २७) शंभरी गाठण्याची शक्यता आहे. यापूर्वी गिरणा धरण १३ वेळा शंभर टक्के भरले आहे. २०२२ मध्ये शेवटचे शंभर टक्के धरण भरले होते. त्यामुळे यंदा चौदाव्या वेळा धरण शंभरी गाठणार आहे. धरण शंभर टक्के भरत असल्याने गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. गिरणा धरणावर सिंचनासोबतच ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या १५८ योजना अवलंबून आहेत. चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, एरंडोलच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.