राज ठाकरेंवर ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर संतापले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर शासनाचा निधी खर्च होत आहे असा आरोप केला असून यावरून वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतप्त झाले आहे. राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमरावती ते माध्यमांशी बोलत होते.
“अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी. उद्या उठाव झाला या राज्याने म्हटले तुम जाव आणि तिकडच्या राज्याने म्हटले तुम जाव तर काय होणार?” असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.