शिवीगाळ करणं भोवलं! अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन
मुंबई । विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन सुरु असताना सोमवारी (1 जुलै) विधीमंडळात मोठा गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. तसेच राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. यामध्ये आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लोकसभेत झालेल्या घडामोडींवर विधान परिषदेत चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अंबादास दानवे यांना विरोध केला. यामुळे वैतागलेल्या दानवेंनी भर सभागृहात आपल्या जागेवरुन बाजूला होत आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी प्रसाद लाड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत शिवीगाळ केली.
या घटनेचा पडसाद आजही विधान परिषदेच्या सभागृहात बघायला मिळाला. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांनी निलंबनावर चर्चेची मागणी केली. पण सत्ताधाऱ्यांनी त्यास विरोध केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: तिथे उपस्थित होते. त्यांनीदेखील निलंबनानंतर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलं. यावेळी सभापतींनीदेखील तिच भूमिका घेतली. तर विरोधकांनी गोंधळ घातला. सभापती हाय हाय, अशी घोषणाबाजी विरोधकांकडून यावेळी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज विधान परिषदेत उपस्थित होते. त्यांनीदेखील अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाईवर भूमिका मांडली. “अशाप्रकारे ज्यावेळी ठराव मांडला गेला त्यावर चर्चा झाली नाही. हा ठराव चर्चेचा ठराव नसतो. या ठरावावर आपण मतदान घेतो. त्यानुसार आपण मतदान घेतलेलं आहे. जी कारवाई नियमानुसार व्हायला हवी ती कारवाई नियमानुसार झालेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा जो आग्रह होता तो चुकीचा होता”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.