पुत्रप्रेमापोटी अजून किती बळी घेणार आहात.? संदीप सावंतांचा रोखडा सवाल
चिपळूण:– सुपुत्राला जिल्हापरिषदेत पाठवण्यासाठी कट्टर समर्थकांचे राजकीय बळी घेतलेत आणि आता सुपुत्राला आमदार करण्यासाठी माझा आणि सचिन कदम यांचा राजकीय बळी घेतलात, अजून किती बळी हवेत.?असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.पण लक्षात असुद्या आम्ही आमचे राजकीय बळी देणार नाही.उलट सहव्याज हिशोब चुकता करू असा रोखठोक इशारा देखील त्यांनी दिला आहे.त्यामुळे ठाकरे गटातील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
राजकारणात अपेक्षा-इच्छा ही असावी,पण ती असुरी इच्छा असू नये.पक्षाला वेठीस धरून स्वतःची आणि मुलाची इच्छा पूर्ण करून घेणे याला नैतिकता म्हणत नाहीत तर ती एक प्रकारे छळवणूक ठरते.आणि भास्करराव आता तेच करत आहेत.त्यांनी पक्षाला वेठीस धरून पदाधिकाऱ्यांचा छळ सुरू केला आहे.ही त्यांची जुनी पद्धत आहे.राष्ट्रवादीत असताना देखील त्यांनी तेच केले.सुपुत्राला जिल्हापरिषदेत पाठवण्यासाठी विजय गुजर सारख्या एका निष्ठावंताचा राजकीय बळी घेतला.आपल्या आमदारकीत अडचण नको म्हणून रामदास राणे,दादा कदम,असे अनेकांचे पंख छाटून बाजूला केलेत.आता सुपुत्रासाठी देखील तीच राजकीय खेळी सुरू केली आहे.असा गंभीर आरोप देखील संदीप सावंत यांनी केला आहे.
स्वतःला चिपळूण मधून उमेदवारी हवी आणि मुलाला गुहागर मधून आमदार करायचे आहे,म्हणून किती बैठका घेतल्या त्या बैठकांचा सर्व रिपोर्ट माझ्याकडे आहे.योग्य वेळी ते मी बाहेर काढेनच,परंतु मा. शरदचंद्रजी पवार साहेबांची घेतलेली भेट कशासाठी होती,त्याबैठकीत काय चर्चा झाली ते एकदा आपल्या कार्यकर्त्यांसमोर आम.जाधवांनी उघड करावे,म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.अन्यथा मी ते उघड करणारच आहे.सुपुत्रासाठी राजकीय पर्याय शोधण्याचा तर तो प्रयत्न नव्हता ना.?असा थेट हल्लाबोल संदीप सावंत यांनी केला आहे.
राजकारणातील तुमची चाणक्य नीती आम्हाला चांगलीच अवगत आहे.परंतु ती चाणक्य नीती नव्हे तर कूटनीती आहे.या कूटनीतीनेच तुमचा गेमओव्हर होणार आहे.मतदारांनी भल्याभल्यांना घरी पाठवले आहे,मतदारांपुढे चाणक्य नीती चालत नाही.याची जाणीव असावी,आता गावोगाव फिरता आहात ना,?मग लोकसभेला तुम्ही आणि तुमचे सुपुत्र कुठे होते.?स्वतःच्या गावात देखील फिरला नाहीत तुम्ही,ये पब्लिक है,सब जानती है.खोटं जास्त दिवस टिकत नाही.आणि सारखे खोटे बोलणे उघडे पडेल म्हणून निष्ठावंताना बाजूला करण्याची घाई झालेली आहे का.?असा प्रश्नही संदीप सावंत यांनी विचारला आहे.
राजकारणातले डावपेच आम्हाला देखील माहीत आहेत.गेली ३० वर्ष मी देखील राजकारणात आहे.पण स्वपक्षात असे राजकीय डावपेच आखून पक्षाचे नुकसान करण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही.यापुढे करणार देखील नाही.लोकसभा निवडणुकीत विनायकजी राऊत आणि अनंतजी गीते यांच्या बाबतीत कोणते राजकीय डाव टाकण्यात आले होते त्याचे सविस्तर विवेचन मी पक्षप्रमुखासमोर एकदा करणारच आहे.मी असा शांत बसणार नाही.माझ्या प्रश्नांची उत्तरे जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत हा संघर्ष चालूच राहणार आहे.आणि मी पक्ष सोडून जावे अशी कोणाची इच्छा असेल तर त्या भ्रमात कोणी राहू नये.मी पक्षात राहणार आणि लढत राहणार,ज्याप्रमाणे आमचा राजकीय बळी घेतला गेला त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय हा संदीप सावंत गप्प बसणार नाही.घोडा मैदान जवळ आहे.सहव्याज परतफेड केली जाईल असा इशाराच त्यांनी दिला आहे.