पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी

0

मुंबई: लोकसभेनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होत असून मात्र पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची खाती बदलली जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी-
सुत्रांच्या माहितीनुसार , भाजपकडून गणेश नाईक (ऐरोली), नितेश राणे (कणकवली), माधुरी मिसाळ (पर्वती), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), अतुल भातखळखर (कांदिवली), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), सुरेश धस (विधानपरिषद) या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संजय शिरसाट (संभाजीनगर), आशिष जैसवाल (रामटेक), भरत गोगावले (महाड) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संग्राम जगताप (नगर) आणि अण्णा बनसोड (पिंपरी) यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. विशेष म्हणजे यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळी यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी चर्चा आहे. भावना गवळींना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे.

याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान प्रमोशन होऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.