चिनावल गावातील संचारबंदी रात्री १२ वाजेनंतर शिथिल,तरी बाजार भरलेला नाही!
"गावाची शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व स्तरीय समिती नेमून जबाबदारी घ्या-अशोक नखाते"
सावदा प्रतिनिधी फरीद शेख
सावदा :-चिनावल गावात कायम स्वरुपी शांतता राखण्यासाठी आपण सर्व स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक समिती बनवून गावातील वाद गावातच मिटल्या पाहीजे.या पुढे जर गावात असे प्रकार वारंवार घडल्यास सध्या लागलेली संचारबंदी पेक्षाही कठोर कारवाई करण्याचा इशारा आज दिनांक २० मे रोजी चिनावल येथे झालेल्या सर्व स्तरीय बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव यांनी दिला.
सदरील बैठक येथील नूतन विद्यालयात आज सोमवार रोजी संध्याकाळी ६ वाजता घेण्यात आली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,रावेर तहसीलदार बंडू कापसे, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे,सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे सह गावातील प्रमुख पदाधिकारी व जबाबदार नागरिक उपस्थित होते.या बैठकीत गावात शांतता राखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या अनुषंगाने चर्चा झाली.गावकऱ्यांनी आपल्या भावना मांडल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांनी या घटनेतील आरोपींना शोधून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई तर करणारच परंतू या पुढे असे घडता कामा नये,कोणी जर आपल्याला भडकवत असेल तर अशा लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका अशी तंबी दिली.
दरम्यान दि. १७ मे रोजी रात्री चिनावल येथे झालेल्या दगडफेक नतंर येथे ३ दिवसांसाठी लागू संचारबंदी मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.म्हणून शेतकरी शेतमजूर यांना शेतातील कामे करता यावी यासाठी सकाळी ७ ते ८ व दुपारी परत येण्यासाठी १२ ते १ अशा दोन तासाची प्रशासनाने शिथीलता दिल्याने आज ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला उर्वरित वेळेत आज दि २० मे रोजी तिसऱ्या दिवशीही सर्वत्र शुकशुकाट व शांतता पसरली होती.तरी बैठकीत ग्रामस्थांनी निर्माण घेतल्यामुळे आज २१ मे रोजीचा बाजार यंदा भरलेला नाही.
गावात जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे,सावदा पोलिस स्टेशनचे सपोनी जालिंदर पळे,पो उप निरीक्षक विनोद खांडबहाले,पोउनि.अमोल गर्जे हे आजही तळ ठोकून आहेत.तर पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने संपूर्ण चिनावल गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले.येथे महसूल विभागिचे तहसीलदार बंडू कापसे,अप्पर तहसीलदार मयूर कळसे,नायब तहसीलदार संजय तायडे,मडळाधिकारी अनंत खवले,तलाठी लिना राणे हे देखील संचारबंदीत लक्ष ठेवून आहे.परिणामी आज दि २० मे रोजी संचारबंदी मध्यरात्री संपणार आहे.