नागरिकांनो लोकजी घ्या! राज्यात या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस कायम असून अशातच आज हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला. जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यासोबतच तापमानामध्ये वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, ढगाळ आकाशामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका कमी झाला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळालं आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, नगर, सांगली, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.