ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर
आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. राज्यातील ४८ पैकी तब्बल ४० लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाने संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक आणि पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांसह अनेक तरुण चेहऱ्यांना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मैदान तयार करण्याची रणनीती स्पष्ट होत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, तसेच ठाणे आणि जळगाव वगळता राज्यातील इतर अनेक मतदारसंघांमध्ये संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत.

कल्याण-भिवंडीची जबाबदारी वरुण सरदेसाई यांच्याकडे, तर शिर्डी-अहिल्यानगरसाठी सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा-सांगलीसाठी नितीन बानुगडे-पाटील, छत्रपती संभाजीनगरसाठी आशीष चेंबुरकर, शिरूरसाठी किरण तावडे आणि पुणे जिल्ह्यासाठी सचिन पडवळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.


‘या’ नेत्यांना संधी
सोलापूर-माढ्यासाठी सुषमा अंधारे, नाशिक-दिंडोरीसाठी रविंद्र मिर्लेकर, बुलढाण्यासाठी नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर, अकोल्यासाठी नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ, तर अमरावतीसाठी नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोलीसाठी बबनराव थोरात, कोल्हापूरसाठी अरुण दुधवडकर, बारामतीसाठी संजय सावंत, धुळ्यासाठी अशोक धात्रक, रावेरसाठी गुलाबराव वाघ आणि नंदुरबारसाठी मुकेश साळुंके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
‘या’ मतदारसंघांसाठीही संपर्कप्रमुख निश्चित
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी प्रदीप बोरिकर, रायगडसाठी संजय मानाजी कदम, मावळसाठी प्रसाद भोईर, पालघरसाठी विलास पोतनीस, साताऱ्यासाठी उदय ढळवी, सांगलीसाठी स्वप्नील कुंजीर आणि हातकणंगलेसाठी महेंद्र इंदुलकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, यवतमाळ-वाशिम, वर्धा, नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांसाठीही संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत.