जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

0

जळगाव । जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार पुनरागमन केल्याने राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या आठवडाभरापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून, आता पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २७ ते २९ जुलैदरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार या कालावधीत काही ठिकाणी जोरदार सरींसह विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच नदी-नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाच्या खंडामुळे कोमेजू लागलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांची वाढ चांगली होत आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य उमटले आहे.

याशिवाय गिरणा, वाघूरसह जिल्ह्यातील प्रमुख व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या सिंचनाची चिंता देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

२३ टक्के पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता

सध्या जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे २३ टक्के पावसाची तूट कायम आहे. मात्र, पुढील तीन दिवस हवामान विभागाने व्यक्त केलेला मुसळधार पावसाचा अंदाज खरा ठरल्यास ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. कृषी आणि महसूल विभागालाही आगामी पावसाबाबत आशा असून, यामुळे खरीप हंगामाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एकूणच, पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, मुसळधार पावसामुळे शेती, जलसाठे आणि भूजल पातळीला मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.