तिकीट हुकल्याची खदखद पुन्हा उफाळली? गुलाबराव पाटील म्हणाले; “नसीब में होगा तो उचलकर आयेगा…”
जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात शेरोशायरीच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. पण मी एवढंच सांगतो, नसीब में होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा. देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगलं होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी भावना बोलून दाखवल्या.


जळगाव विधान परिषद जागेसाठी गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतल्याचेही सांगितले जाते. मात्र महायुतीतील जागावाटपात ही जागा भाजपकडे कायम राहिल्याने त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या गुलाबराव पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अंतिम निर्णय भाजपच्या बाजूने गेल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
अर्ज भरताना गैरहजेरीची चर्चा
महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल होत असताना गुलाबराव पाटील अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे जळगावातील महायुतीच्या राजकारणात पडद्यामागे अस्वस्थता असल्याची चर्चा रंगली आहे.