नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्पोट, महाजन काय म्हणाले?
जळगाव । ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून संजय राऊत यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौप्यस्पोट केला आहे. राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संकटातून बाहेर काढल्याचा दावा केला होता. राऊतांच्या पुस्तकातील दाव्याचा आता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला आहे. यावर महाजन म्हणाले, “संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते वाटेल तशी फालतू बडबड करतात. आता त्यांना कोणी ऐकत नाही, कोणी गांभीर्याने घेत नाही.”
महाजनांनी राऊतांच्या दाव्याचा समाचार घेतला. “युद्ध सुरू असताना राऊत म्हणाले, मोदींनी आणि शाहांनी राजीनामा द्यावा. सैनिकांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. देशाबाहेरील अतिरेक्यांशी लढायचं की देशातील अशा अतिरेक्यांबद्दल लढायचं. अशा माणसाबद्दल न बोललेलेच बरे,” असे महाजन म्हणाले. राऊतांनी ठाकरे कुटुंबाशी मोदी-शाह यांनी निर्घृण वर्तन केल्याचा आरोप केला होता, यावर महाजनांनी राऊतांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केले. “खऱ्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत आम्ही आहोत. काँग्रेसच्या मांडीवर बसून विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राऊतांच्या पुस्तकाला महत्त्व न देण्याचे आवाहन करताना महाजन म्हणाले, “राऊत कसा माणूस आहे, हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या पुस्तकाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.” शनिवारी होणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊतांचे दावे आणि महाजनांचा पलटवार यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.