जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी
जळगाव :एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत चालला असून, जळगाव जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवसांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान अधिक असल्याने नागरिकांनी उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून तापमानाचा पारा ४३ अंशांवर स्थिरावला आहे. यातच गेल्या दोन तीन दिवसापासून तापमान ४२ अंशाखाली आहे.सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारी तर घराबाहेर पडणं कठीण होऊन जातं.
या अचानक वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारपेठा, रस्ते, बस स्थानकं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. दुपारच्या वेळात रस्ते निर्मनुष्य होऊ लागले असून, नागरिक उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी घरातच राहणं पसंत करत आहेत.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात उद्या ३० एप्रिल आणि १ मे रोजी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे.