राज्यावर ‘अवकाळी’ संकट! आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तापमान वाढले आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज देखील अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याठिकाणी अवकाळी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा, पुणे, संभाजीनगर, जळगाव आणि जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमानात मोठी वाढ होईल.
मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहिल आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पुण्यात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक वायाला गेले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजी घ्यावी आणि काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.