जळगावकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

0

जळगाव/मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे खान्देशातील जळगाव आणि धुळ्यातही नीचांकी तापमानाची नोंद आहे. यातच हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याचे सांगितलंय.

जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतच असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा ७.८ अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या तापमानातदेखील लक्षणीय घट झाल्यामुळे दुपारच्या वेळेस गारठा जाणवत आहे. दरम्यान, आज १७ आणि उद्या १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

कडाक्याच्या थंडीपासून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम संपूर्ण जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो थंडीच्या काळात घराबाहेर निघणे टाळावे. थंडीपासून बचाव करतील अशीच कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

हरभरा, गहू तरारणार…
कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक फायदा हा रब्बी पिकांना होत आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी थंडी उपयुक्त ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.