हवामान खात्याचा जळगावसह ९ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अलर्ट
जळगाव/मुंबई । राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे प्रचंड गारठा वाढलाय. अनेक ठिकाणी किमान तापमानात घसरण झाली असून यातच हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही थंडीचा अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी धुळ्यामधील तापमान ४ अंशावर पोहचले आहे. दुसरीकडे जळगावात ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. खान्देशात सध्या पसरलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
थंडीचा या जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्यातील ९ जिल्ह्यांना हवामान खात्याने थंडीचा यलो अलर्ट दिला आहे. जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, पुण्याचा घाटमाथा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.