उत्तरेकडून थंड वाऱ्यामुळे जळगावात थंडीची लाट; किमान तापमान 9 अंशाच्या खाली
मुंबई/जळगाव । सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीची लाट पसरली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र असू्न किमान तापमानाचा पारा 8 अंशापर्यंत पोहोचला आहे. तर राज्यातील तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून शनिवारी सर्वाधिक नीचांकी तापमान ८.४ डिग्री सेल्सिअस राहीला आहे, उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमानात घट
दरम्यान या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रानंतर आता विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. तापमानात घट म्हणजेच या भागातील लोकांना आता आणखीनच गारठ्याचा सामना करावा लागत आहे. येत्या चार दिवसात यात अजून वाढ होणार असून थंडीचा जोर वाढणार असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
नऊ ते दहा अंशाच्या खाली आला पारा
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून 18 डिसेंबरपर्यंत ही लाट अधिक तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आता धुक्याशी सामना
थंडीची लाट ज्या प्रकारे वाढत आहे त्याचे कारण गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. थंडीच्या लाटेमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्ली आणि परिसरात थंडीच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. येत्या काही दिवसांत लोकांना धुक्याचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.