चौधरी बंधूंचा सूतगिरणीत महाघोटाळा; मंत्री अनिल पाटलांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर आरोप
अमळनेर (जळगाव) : शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या दोन्ही बंधूंनी मिळून दहा वर्षात सुतगिरणी तर उभारलीच नाही; पण त्यात महाघोटाळा केल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.
जळगावच्या अंमळनेर येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
तर भरचौकात उत्तर द्यावे
सूतगिरणी सुरु करण्यासाठी १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यांनी हा नुसता घोटाळा केला नसून महाघोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावानांशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही. यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात याचे उत्तर द्यावे, असे आव्हान ही मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे.