विरोधकांच्या टिकांमुळे होतोय आ.चव्हाण यांचा फायदा; गावेच्या गावे करत आहेत भाजपात पक्षप्रवेश

0

चाळीसगाव: सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र हे सर्व करत असताना कधी कधी नको ते लिहून नको तिथे शेअर केल्याने सहानुभूती ऐवजी याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीच्या रांगेत असलेल्या काही नेत्यांना बसताना दिसत आहे. खालच्या दर्जाच्या तथ्यहीन पोस्टमुळे नागरिकांची सहानुभूती ही विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांना मिळू लागली असून आरोप करा मात्र खालच्या दर्जाच्या टिका केल्या तर त्याचा कसा फटका बसतो हे गेल्या तीन चार दिवसांत तालुक्यातील अनेकांच्या लक्षात आले आहे. या सर्व प्रकारांमुळे ‘आता काय लिहू’ असा प्रश्न सोशल मीडिया टिका बहाद्दर पोस्टकऱ्यांना पडला आहे.
तसं पाहिलं तर निवडणुका म्हटले कि आरोप प्रत्यारोप आलेच. मात्र कधी कधी चहापेक्षा किटली जास्त गरम असल्याचा अनुभव नागरिकांना येत असतो आणि किटलिंच्या अती गरमपणामुळे जवळचे सुद्धा दुरावू लागतात. चाळीसगाव तालुक्यात देखील सध्या तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. ज्या लिखाणातून विरोधी नेत्यांची बदनामी करून त्यांच्याजवळील लोक दुरावण्याचा प्रयत्न केला गेला, वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेल्या त्याच लिखाणाचा बूमरॅंग होऊन आता आता आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेशासाठी सर्वसामान्य नागरिकांची रांग लागलेली दिसत आहे.

आमदारांवर टिका करायला गेले अण जवळच्या लोकांना गमावून बसले

खालच्या दर्जाचे लिखाण करून ज्यांची बदनामी करायला गेलो त्यांची बदनामी तर झालीच नाही उलट नागरिकांना सत्यता समजल्याने आता मंगशदादा चव्हाण यांच्याकडे भाजपा पक्ष प्रवेश वाढल्याचे दिसत आहे. पुढून खालच्या दर्जाच्या टिकेचा भडीमार होतोय आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण मात्र आपली संस्कृती जपत त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनाही खालच्या दर्जाच्या टिका करू नका, कुणाला काय पोस्ट करायच्या आहेत त्या करू द्या असे फर्मान सोडत असल्याने आ.चव्हाणांच्या बद्दल एक वेगळीच इज्जत नागरिकांच्या मनात घर करू लागली आहे.
या सर्व प्रकारांमुळे ‘अरे बाबा तू आता टिका कमी कर आणि आपलं चांगलं काहीतरी समोर आण रे, लोकं नाराज होऊन तिकडे जाऊ लागली रे’ असा सल्ला खुद्द विरोधी नेतेही टिका बहाद्दरांना देऊ लागले आहेत.

नेत्याबद्दल असणारा समज आणि पक्षप्रवेश

याबाबत बोलताना एका कार्यकर्त्याने सांगितले कि, आम्ही आमदार मंगेशदादांचे कायम विरोधक होतो. त्यांचे वागणे, बोलणे हे तापट असल्याचे आम्ही आमच्या लोकांमधून ऐकत आलो होतो त्यामुळे त्यांच्याजवळ जात नव्हतो. मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात आम्ही आमच्या कामानिमित्त त्यांना भेटलो त्यावेळी त्यांच्या कामाची गती, प्रत्येकाला आपलेपणाची दिलेली वागणूक अण कार्यकर्ता चुकला तर त्याला तिथेच खडसावून सांगण्याची पद्धत आमच्या मनात घर करून गेली. जितकी मंगेशदादांची बदनामी केली गेली तशी ही व्यक्ती नाही या मतावर आम्ही आलो आणि जर राजकारण विरहित कामे होत असतील, मान सन्मान मिळत असेल आणि प्रत्येक चांगल्या वाईट क्षणी मंगेश दादांसारख्या नेत्याची खंबीर साथ मिळणार असेल तर सर्वसामान्य नागरिकाला अजून काय हवे असते असा प्रतिप्रश्न त्या नागरिकाने करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिका, आरोप करताय तर ते सिद्धही करण्याची धमक हवी ना

सोशल मिडीयावर खालच्या दर्जाचे आरोप करणे, टिका करणे सोपे असते मात्र ते सिद्धही करावे लागतात अन्यथा तुमच्या सोबत असणारे लोकच त्याबाबत शहानिशा करून तुम्हाला ‘लबाड’ पदवी देऊन तुमच्यापासून दूर जातात. सध्या जे आरोप केले गेले, खालच्या दर्जाचे लिखाण केले गेले ते नागरिकांना पटलेले दिसत नसून चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावे च्या गावे सध्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत असे पक्षप्रवेश करणाऱ्या अन्य एका कार्यकर्त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.