दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; विद्यार्थ्यांना फटका
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात बारा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा शुल्क वाढीचा थेट फटका आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. नव्या वाढीव परीक्षा शुल्कानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 470 रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून 490 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहिती अशी की, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्याने वाढ केली आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे ही शुल्क वाढ करण्यात आली असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितल आहे. त्यामुळे आता दहावीसाठी 420 ऐवजी 470 रुपये मोजावे लागतील तर बारावी साठी 440 रुपये ऐवजी 490 रुपये एवढे परीक्षा शुल्क पालकांना भरावे लागणार आहे. दरम्यान या शुल्कासह प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. 1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत. अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.