धक्कादायक । चोपडा तालुक्यात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

0

जळगाव । जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजार होता. परिसरातील ग्रामस्थ याठिकाणी बाजारासाठी आले होते. दरम्यान, काही जणांनी पाणीपुरी विक्रेत्याकडून पाणीपुरी खाल्ली. तसेच काहींनी घरी पार्सल देखील नेले.पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना मळमळ होऊ लागली. काहींना उलटी तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यापैकी अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. संध्याकाळी ६ वाजेनंतर रुग्णांची संख्या वाढतच गेली.

विषबाधा झालेल्यांमध्ये कमळगाव, चांदसणी, मितावली, पिंप्रीसह आजूबाजूच्या खेड्यांमधील ग्रामस्थांचा समावेश आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगितलं जातंय. आतापर्यंत जवळपास ८० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, घटना समजल्यानंतर चोपडा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांची प्रकृती जाणून घेतली. पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, या पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.