तापमानाचा ‘ताप’ कायम ; पुढील तीन दिवस जळगावला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’
मान्सून लवकरच धडकणार असल्याची वार्ता येऊन धडकली आहे. पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेपासून सूटका मिळालेली नाही. सध्या जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट आहे. आगामी तीन दिवस जळगावला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला तापमानाचा ताप या आठवड्यातही कायम राहणार आहे. जळगावात आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणारा असणार आहे. तापमान ४५ अंशावर राहील तर आर्द्रताही जास्त असेल.
यलो अलर्टचा धोका
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह उपनगरात दमट वातावरण राहिल. तर सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना पण उष्णतेच्या लाटेचा आणि दमटपणाचा फटका बसणार आहे.सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या भागात दोन दिवस उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांत पावसाची शक्यता
आयएमडीच्या अंदाजनुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. काही भागात ढगाळ वातावरण असेल.