राज्यातील सर्वसामान्यांना दिलासा; ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार?
मुंबई । उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल.. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो. मात्र वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने इतिहासात पहिल्यांदा वीज दरात कपातीचा प्रस्ताव सादर केला असून यामुळे ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार आहे.
महावितरणं दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला असून, नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2025 पासून लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे वीजबिलातील ही घट शक्य होत असून सामान्यांना या प्रस्ताव आणि निर्मयाचा फायदा होताना दिसणार आहे.
किती फरकानं कमी होणार वीजदर?
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापासून वीज दरात प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया इतकी कपात होऊ शकते. इतकंच नव्हे, तर 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या कालावधीत वीज दरात साधारण 12 ते 13 टक्क्यांची घटही अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं सामान्यांना हा एक मोठा दिलासा ठरणार असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच ही प्राथमिक घट होत असल्यामुळं यंदा वीजबिल नागरिकांना घाम फोडणार नाही असंच म्हणावं लागेल.
कसं आहे दर कपातीचं गणित?
महावितरणच्या माहितीनुसार 100 हून कमी युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात 5.14 रुपयांवरून 2.20 रुपयांची घट लागू होऊ शकते. तर, 101-300 युनिटदरम्यान वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचे दर प्रति युनिट 11.60 रुपयांवरून 9.30 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत.