वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
मुंबई: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. याप्रकरणातील काही आरोपी आणि वाल्मिक कराड हे अद्याप फरार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 22 दिवस उलटूनही अद्याप पोलिसांना वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख हत्याप्रकरण सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस हे मंगळवारी मुंबईत येणार आहेत. सुरेश धस हे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही वाल्मिक कराड अद्याप फरार आहेत. सीआयडीकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. यासाठी वाल्मिक कराड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यावेळी सुरेश धस यांच्याकडून आणखी एक महत्त्वाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याची मागणी सुरेश धस करणार आहेत. ही मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का, हे पाहावे लागेल. सुरेश धस हे मंगळवारी दुपारी मुंबईत पोहोचतील.
त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कधी जातात आणि या भेटीत काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही याप्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. तेदेखील सध्या मुंबईत आहेत.