उद्धव ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
ऐन हिवाळ्यात नागपूरमधील राजकीय वातावरण तापलेय. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहातआरोप-प्रत्यारोपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. खातेवाटपामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच फडणवीस-ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यामुळे नागपूरसह राज्याच्या राजकारणात फडणवीस-ठाकरे एकत्र येणार का? या चर्चेनं जोर धरलाय.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट दालनात जाऊन भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सात ते आठ मिनिटे चर्चा झाली. महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यांदाच भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच ही सदिच्छा भेट असल्याचं अदित्य ठाकरे यांनी सांगितले. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली? वेगळी राजकीय समीकरण तयार होतेय का? या राजकीय चर्चेनं जोर धरलाय.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे थेट नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले. या भेटीदरम्यान, ७ मिनीटात काय चर्चा रंगल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.
उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात पोहचले. विधान भवनात पोहचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदारांशी चर्चा केली आणि नंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दालनात पोहोचले. दोघांमधली ही सदिच्छा भेट मानली जात आहे. मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी फक्त उद्धव ठाकरे नसून, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत.