तापमानात चढ-उतार : जळगावसह महाराष्ट्रातील हवामान स्थिती काय?
जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात चढ-उतार होत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आजपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात किमान तापमानात घट होत असल्यामुळे पुन्हा गारठा वाढत आहे, मात्र अद्यापही हवी तशी थंडी परतलेली नाही.
दिवसा ऊन आणि रात्री गारठा वाढल्यामुळे काही जणांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचा पारा हळू हळू घसरत आहे, त्यामुळे थंडी परत येत असल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे आणि वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत आहेत.
नवीन वर्षाच्या सुरवातीला सुरू झालेला थंडीचा कडाका दोन ते तीन दिवसात कमी झाला. त्यानंतर महाराष्ट्रातून थंडी गायब झाली. मागील आठवड्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. जळगावातही दिवसभर ऊन आणि रात्री गारव्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या काही भागातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली, यामुळे काही ठिकाणी रात्री थंडी जाणवत आहे. तर दिवसभर कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे.
पुढील पाच दिवस राज्यात तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.