महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ
मुंबई । राज्यामधील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीने गारठलेलया महाराष्ट्रात पुन्हा तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात आजही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सकाळच्या सुमारास गारठा आणि दाट धुके पाहायला मिळत आहे. तर दुपारी कडक ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण झाले आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासांमध्ये किमान तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आकाश ढगाळ राहून विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर उर्वरीत महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिल. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे.
राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबसह महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.