राज्यातील शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर
मुंबई । राज्यातील शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.यात सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत 208, मार्चमध्ये 215 आणि एप्रिलमध्ये 180 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. याचा हिशेब लावायचा झाल्यास या चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
या चार महिन्यांत अमरावतीमध्ये 116, यवतमाळमध्ये 108, वाशिममध्ये 77, जळगावमध्ये 62, बीडमध्ये 59, छत्रपती संभाजीनगरमध्ये 44, धाराशिवमध्ये 42, वर्धामध्ये 39, नांदेडमध्ये 41, बुलढाण्यात 18, धुळ्यामध्ये 16, तर अहमदनगरमध्ये 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
तर दुसरीकडे 838 पैकी यात 171 शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली. त्यात आतापर्यंत फक्त 104 शेतकऱ्यांनाच्या कुटुंबीयांना एक लाखाची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 62 शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर 605 शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. राज्यात आरोप प्रत्यारोप आणि फोडाफोडीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही का, असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.